स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान प्रभावीपणे राबवा; ध्वज संहितेचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा,दि.6: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियान उत्साहात आणि लोकसहभागातून राबविण्यात यावे, तसेच १३, १४ आणि १५ ऑगस्ट या तीन दिवसांत प्रत्येक शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आणि प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या.
हर घर तिरंगा अभियानाच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गावडे, प्रांताधिकारी आशिष बारकुल आणि नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तिरंगा फडकविताना ध्वज संहितेचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असून राष्ट्रध्वजाचा सन्मान अबाधित राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी, तसेच विशेषतः १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण तसेच ध्वजावतरण करताना ध्वज संहितेचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.
१४ ऑगस्ट रोजी फाळणी विभीषिका स्मृती दिन निमित्त भारताच्या फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या शिवाय ९ ते १३ ऑगस्ट या कालावधीत वंदे मातरम्’चे सामूहिक गायन शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व विविध संस्थांमध्ये आयोजित करण्याचे नियोजन करावे. स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्य रॅलीचे प्रभावी नियोजन प्रत्येक विभागाने करावे. या रॅलीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्था, विद्यार्थी, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.
0000


Leave a Reply