
‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत पुनर्विकसित 103 रेल्वे स्थानकांचे लोकार्पण!
महाराष्ट्रातील 15 रेल्वे स्थानके लोकोपयोगी आधुनिक सुविधांनी सज्ज…
नवी दिल्ली/ मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (ऑनलाईन) ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण आणि इतर प्रकल्पांचे उदघाटन’ केले. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे त्यापैकी एक रेल्वे स्थानक असलेल्या परळ, मुंबई येथील रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.
या योजनेच्या माध्यमातून देशभरातील 103 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात आलेल्या रेल्वेस्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 11 वर्षांत देशात तब्बल 34,000 किमी नवीन रेल्वेमार्गांची उभारणी करण्यात आली आहे. यासोबतच, देशभरातील 1,000 रेल्वे स्थानकांचे आधुनिक पद्धतीने पुनर्विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 100 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून, त्यापैकी 15 स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. राज्यातील आमगाव, चांदा फोर्ट, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, मूर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, सावदा, शहाड तसेच मुंबईतील चिंचपोकळी, परळ, माटुंगा आणि वडाळा रोड ही स्थानके आता लोकोपयोगी आधुनिक सुविधांनी सज्ज झाली आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला देशातील सर्वात आधुनिक रेल्वे स्थानक म्हणून विकसित करण्यासाठी ₹2800 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांवरसुद्धा लोकोपयोगी सोयी-सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केवळ सौंदर्यीकरणापुरता मर्यादित न राहता, त्यांना एक प्रवासी-अनुकूल केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. म्हणूनच भारतीय रेल्वे आता जगातील आधुनिक रेल्वे गणली जात आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि इतर मान्यवर (ऑनलाईन) उपस्थित होते.
Leave a Reply