
‘कायकवे कैलास ‘ हे तत्त्वज्ञान देणारे महात्मा बसवण्णा हे जगातील पहिल्या लोकशाहीवादी आणि समतावादी संसदेचे निर्मिक : डॉ.राजेंद्र कुंभार
सांगली:कायकवे कैलास ‘ हे तत्त्वज्ञान देणारे महात्मा बसवण्णा हे जगातील पहिल्या लोकशाहीवादी आणि समतावादी संसदेचे निर्मिक असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले. लिंगायत धर्माचा पहिला विचार ज्ञान मिळवणे हा आहे. नैतिक समाज नसेल तर समाज सुधारणार नाही, असेही ते म्हणाले. मणेराजुरी मधील समस्त लिंगायत समाजाच्या वतीने 920 वी बसव जयंती साजरी करण्यात आली, त्यामध्ये प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार सर बोलत होते.
कोल्हापूरचे तरुण बसव अभ्यासक यश आंबोळे यांनी बसवण्णांचा एकूण जीवनपट उलगडत असताना बाराव्या शतकामध्ये बसवण्णांनी रूजविलेले समतावादी विचार, शरण साहित्याची निर्मिती, बसवकल्याण ला असणारा बसव मंटप व त्याची भारताबाहेर आणि आजूबाजूच्या देशांच्या मध्ये पसरलेली कीर्ती याविषयी माहिती दिली. लिंगायत धर्माच्या तत्त्वज्ञानाविषयी त्यांनी सखोल माहिती दिली.
डॉ.राजेंद्र कुंभार सरांनी आपले विचार मांडताना लिंगायत धर्माचा पहिला विचार ज्ञानग्रहण करणे हा असल्याने बसव कल्याण मध्ये निर्माण झालेले वचन साहित्य हे आपल्या लिंगायताना माहीत असायला हवे,त्याचा अंगीकार करायला हवा, लिंगायत हा फक्त धर्म नसून तो एक विचार आहे तो विचार ज्याच्या अंगीकारला पाहिजे. कायक वे कैलास हे महात्मा बसवण्णांचे तत्वज्ञान, त्यांनी दिलेली श्रमाला प्रतिष्ठा याविषयी उदाहरणासह माहिती डॉ. राजेंद्र कुंभार यांनी दिली . तथागत गौतम बुद्ध,भगवान महावीर, महात्मा बसवण्णा महात्मा ज्योतिबा फुले,महात्मा गांधी यांचे विचार जगाला दिशादर्शक असणारे विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिशय वाईट कालखंडातून सध्या जगाची वाटचाल होत असताना लिंगायत तत्वज्ञान आणि लिंगायत विचारच यातून आपल्याला मार्ग काढण्यासाठी उपयोगी येऊ शकतात हे त्यांनी सांगितले. माळी समाज कार्यालय, मणेराजुरी येथे झालेल्या बसव जयंती सोहळ्यामध्ये लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मणेराजुरी मधील अनेक ज्येष्ठ व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांची संख्याही लक्षणीय होती. त्याचबरोबर कोल्हापूरहून आवर्जून विलास आंबोळे,दत्ता घुटुगडे , तासगावहून वासुदेव गुरव अमर खोत, नूतन परीट,उत्तम परीट कवठेमंकाळहून,भगवान सोनंद,भाई दिगंबर कांबळे यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजाता म्हेत्रे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश कुचकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन तरुण वर्गाने अतिशय उत्साहाने केले होते.
Leave a Reply