सातारा: सातारा येथे येत्या दिनांक दोन व तीन मे रोजी होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराठीतील ख्यातनाम गायक शाहीर आणि विद्रोही शाहिरी जलसाकार तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनापासून संबंधित असलेले शाहीर संभाजी भगत यांची निवड जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांनी हे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे अशी माहिती विद्रोहीचे जेष्ठ नेते डॉ. बाबुराव गुरव, विद्रोहीचे मार्गदर्शक क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू एडवोकेट सुभाष पाटील व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पत्रकार परिषदेला संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ सुहास महाराज फडतरे, कार्याध्यक्ष कॉ विजय मांडके, सरचिटणीस एडवोकेट राजेंद्र गलांडे, प्रा. गौतम काटकर आदी उपस्थित होते. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त हे संमेलन साताऱ्यात घेतले जात आहे.
शाहीर संभाजी भगत हे मुळचे सातारा जिल्ह्यातील पांचगणी जवळील महू गावचे. संभाजी भगत हे लहानपणापासूनच गावातल्या कलावंतांची गायकी ऐकतच मोठे झाले. भजन व भारुडांवर संभाजी भगत याचा कलावंत पिंड पोसला गेला. पुढे ते मुंबईत आले. डाव्या चळवळीशी जोडले गेले. शाहीर संभाजी भगत यांनी गावाकडचे कलासंचीत येथील नव्या फॉमर्मध्ये परावर्तित केले.
संभाजी भगत यांनी अनेक पोवाडे गायले आहेत. राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळालेल्या ‘कोर्ट’ या चित्रपटातील गाणे त्यांनी गायले आहे. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या आगळ्यावेगळ्या अशा नाटकामुळे त्यांना नवी ओळख मिळाली या नाटकाची मूळ संकल्पना, नाटकातील गीते व संगीत संभाजी भगत या नाटकाला त्यानंतर शिवाजी अंडरग्राउंड ची दिल्लीची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा भरवीत असलेल्या आंतरराष्ट्रीय भारंगम नाट्य महोत्सवासाठी निवड झाली.
आपल्या लोकांचे वास्तव ठोक शब्दात मांडत त्यातून विद्रोहाची ज्वाला फुलवण्यासाठी संभाजी भगत यांनी नवे व्यवहारातील शब्द शोधले मुंबईच्या धारावीत झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनात त्यांनी’ हे पालखीचे भोई, ह्रयांना आईची ओळख नाही’ हे गीत सादर केले. तेंव्हा सारे वातावरणच भारावलेल्या सारखे झाले. आव्हान नाट्यमंचातर्फे संभाजी भगत यांनी शाहीर विलास घोगरे यांच्याबरोबर अनेक पथनाट्य सादर केली. शाहीरी कार्यक्रम केले. कलेतून सतत समकालीन वास्तवाला भिडत राजकीय भूमिका घेणारा शाहीर म्हणून त्याचे लोककलेतील स्थान वादातीत आहे.
संभाजी भगत यांनी लिहिलेले लेखन साहित्य व इतर, अडगळ (नाटक), कातळाखालचे पाणी (आत्मचरित्र), तोड ही चाकोरी (गाण्यांचा संग्रह), रणहलगी (लेख संग्रह), उंदीर नावाचे भारुड आणि गिरणीचा वग हे मुक्तनाट्य
शाहीर संभाजी भगत हे नुकतेच 14 देशांमध्ये जाऊन आलेले आहेत. तेथील अनेक महत्वाच्या विद्यापीठांमध्ये त्यांनी पदव्युत्तर विद्यार्थी व प्राध्यापकांपुढे पर्यायी सांस्कृतिक राजकारणाची मांडणी केली आणि पर्यायी सांस्कृतिक राजकारण आपल्याला उभे केले पाहिजे असे तेथे ठासून सांगितले. अशा या लोककलेचा बाज असलेल्या विद्रोही साहित्यिक कलावंतांची विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड आनंदमय अशीच आहे.
संभाजी भगत यांनी 5 व्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन आणि पहिल्या लोक सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलं आहे. ‘सरपंच भगिरथ’ आणि ‘नागरिक’ या चित्रपटाना संभाजी भगत यांनी संगीत दिले. तर, ‘फनरल’ आणि ‘तुझ्या आईला’ या चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. संभाजी भगत यांना अस्मितादर्श पुरस्कार, मिफ्ता पुरस्कार, प्रबोधन मित्र पुरस्कार, संत तुकाराम हे पुरस्कार मिळाले आहेत.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र आणि विद्रोही संमेलन संयोजन समिती, सातारा यांच्यावतीनं लवकरच १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली जाईल, अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव आणि डॉ. बाबुराव गुरव यांनी दिली.
सातारा मध्ये २२ वर्षानंतर विद्रोही साहित्य संमेलन
सातारा येथे यापूर्वी ४ थे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन २००२ मध्ये झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव त्या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष होते. आता २२ वर्षानंतर पुन्हा एकदा साताऱ्यात विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
विद्रोही साहित्य संमेलनांचा प्रवास आणि अध्यक्ष
पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलन धारावी (मुंबई) येथे पार पडल्यानंतर कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद), सातारा, सावंतवाडी, पंढरपूर, धुळे, सोलापूर, इंदापूर, सांगली, राहुरी, बीड, शहादा, पुणे या ठिकाणी संमेलने झाली आहेत. आजपर्यंत झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बाबुराव बागुल, वाहरू सोनावणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. बाबा आढाव, राजन खान, डॉ. आ. ह. साळुंखे, राजाभाऊ शिरगुप्पे, डॉ. बाबुराव गुरव, रुप बोधी-कुलकर्णी, नजुबाई गावित, डॉ. भारत पाटणकर यांनी भूषविलेली आहेत.



Leave a Reply